रविवार, १३ ऑक्टोबर, २०१३

पायलीन: आव्हानांचे 'महावादळ'

'पायलीन' या अतितीव्र चक्रीवादळाचा प्रभाव (व्हेरी सिवेर सायक्लोन) ओसरून त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर झाले आहे. दरम्यानच्या काळात ओडीशाच्या गोपालपूरजवळील त्याच्या जमिनीवरील आगमनापासून ते छत्तीसगड- झारखंडपर्यंतच्या बारा तासांच्या प्रवासादरम्यान त्याने आपल्या रौद्र रूपाचा परिचय जगाला करून दिला आहे. भारतीय किनारपट्टीला धडकणाऱ्या चक्रीवादळांपेक्षा या वादळाची तीव्रता दुप्पटीपेक्षा अधिक असल्यामुळे त्यामुळे होऊ शकणारे नुकसानही त्याच प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. भारतासाठी 'हरिकेन' किंवा 'टायफून'सारखी महाचक्रीवादळे (सुपर सायक्लोन) ही खूपच दुर्मिळ असतात. पायलीन हे चक्रीवादळ 'सुपर सायक्लोन'ची पातळी गाठू शकणार असल्यामुळे त्याचा फटका बसणारे किनारपट्टीवरील नागरिक, आपत्ती निवारण करणारे प्रशासन आणि चक्रीवादळातील घडामोडींवर निरंतर लक्ष ठेवून अंदाज वर्तवणाऱ्या हवामानशास्त्रीय संस्थांसाठी 'पायलीन' हे आव्हानांचे वादळच ठरणार आहे.

भारतीय उपखंडातील चक्रीवादळांची निर्मिती  

भारतीय उपखंडाचे पावसाळ्यातील हवामान हे मुख्यतः विषुववृत्ताजवळील हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि काही प्रमाणात अरबी समुद्रात घडणाऱ्या घडामोडींवर अवलंबून असते. उत्तर गोलार्धात सूर्याचा आकाशातील प्रवास हा २१ मार्च ते २२ सप्टेंबर (या दोन दिवशी सूर्य विषुववृत्तावर असतो) या कालावधीत होतो. २१ जून रोजी सूर्य उत्तर गोलार्धातील आपली परिसीमा गाठतो (२३.५ अंश- कर्कवृत्त). या वेळी उत्तर गोलार्धात उन्हाळ्याने उच्चांक गाठलेला असतो. या कालावधीत भारतीय उपखंड आणि लगतच्या समुद्रावर सूर्याची किरणे अधिकाधिक लंबरूप पडल्यामुळे भारताला मान्सून अनुभवायला मिळतो (समुद्र आणि जमिनीतील दाबाच्या फरकामुळे समुद्रावरून बाष्पयुक्त वारे भूप्रदेशात वाहू लागतात). सूर्याचा दक्षिण दिशेने विषुववृत्ताजवळून प्रवास होत असताना (सप्टेंबरनंतर) त्या भागातील समुद्रपृष्ठाचे तापमान वाढून कमी दाबाची क्षेत्रे (१ हेक्टो पास्कल- दाबाच्या फरकाचे एकक) निर्माण होऊ लागतात. कमी दाबाच्या क्षेत्रात रिकामी झालेली जागा बाजूच्या जास्त दाबातील हवा भरून काढण्याचा प्रयत्न करते. पृथ्वीच्या परिवलानामुळे त्या हवेला वक्राकार गती प्राप्त होते आणि कमी दाबाभोवती वारे चक्राकार गतीने फिरू लागतात (उत्तर गोलार्धात त्यांची फिरण्याची दिशा ही घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने असते, तर दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने). चक्राकार गती आणि कमी दाब यांच्या प्रभावामुळे उबदार समुद्राकडून मिळणारे बाष्प त्या क्षेत्रामध्ये वातावरणात वर वर सरकू लागते. या बाष्पाने १२ ते १५ किलोमीटरची उंची गाठली की त्याचे दवबिंदूत रुपांतर होते (कंडेन्सेशन). या प्रक्रियेत मुक्त होणारी ऊर्जा कमी दाबाच्या क्षेत्राला प्राप्त होते आणि त्याचे स्वरूप आणखी विस्तारू लागते. 

ही प्रक्रिया जितकी जास्त काळ चालेल तितके हे क्षेत्र आणखी तीव्र होऊन चक्रीवादळाचे रूप धारण करते. चक्रीवादळ निर्माण झाल्यावर त्याच्या मध्य भागातील दाब ४.५ ते ८.५ हेक्टोपास्कल इतका खाली उतरतो. तर त्याच्या केंद्राभोवती फिरणाऱ्या वाऱ्यांची गती ताशी ६० ते ९० किलोमीटर इतकी होते. वादळ जर अधिक काळ समुद्रावर राहिले तर दाब आणखी कमी होत जातो, वाऱ्यांचा वेग आणखी वाढतो आणि चक्री वादळाचा घेरा शेकडो किलोमीटर पर्यंत पसरतो. 'सुपर सायक्लोन'मध्ये तर दाब ६५ हेक्टोपास्कल इतका खाली उतरतो, तर केंद्राभोवती फिरणारे वारे ताशी २५० किलोमीटरचा वेग गाठतात आणि या महाचक्रीवादळाचा घेरा तब्बल दोन हजार किलोमीटरपर्यंत विस्तारतो. (प्रशांत महासागरात निर्माण होणाऱ्या अशा महाचक्रीवादळांना टायफून, तर अटलांटिक महासागरात निर्माण होणाऱ्या महाचक्री वादळांना हरिकेन म्हणतात.)  
  
याच काळात चक्रीवादळाच्या मधोमध ऊर्ध्वगामी बलामुळे (सेंट्रीफ्युजल फोर्स) मोकळी गोलाकार जागा निर्माण होते ज्याला 'सायक्लोन आय' (चक्रीवादळाचा डोळा) म्हणतात. त्याचा आकार साधारणपणे ३० ते ६० किलोमीटर इतका असतो. या 'आय' मध्ये वातावरण अगदी स्वच्छ असते (अगदी दिवसा निरभ्र आकाश, तर रात्री तारे पाहता येऊ शकतील इतकी) आणि तेथील तापमान बाजूच्या वातावरणाच्या तुलनेत आठ ते दहा अंशांनी अधिक असते. 'सायक्लोन आय'च्या भोवती अतिशय वेगवान वाऱ्यांची आणि ढगांची फिरती भिंत असते, जिला 'आयवॉल' म्हणतात. चक्रीवादळामुळे होणारे सर्वाधिक नुकसान या 'आयवॉल'मुळेच होत असते. वाऱ्यांचा प्रचंड वेग (ताशी ९० ते २५०) आणि प्रचंड पाऊस (चोवीस तासांत ५०० मिलीमीटरपेक्षा अधिक) यांमुळे या फिरत्या भिंतीची धडक ही प्रलय घडवून आणते. या भिंतीच्या बाहेर चक्रीवादळाला ढगांनी बनलेल्या काही शाखाही असतात. त्यांची घनता केंद्रापासून बाहेरील भागात कमी कमी होत जाते. त्यांच्या घनतेप्रमाणे त्या त्या भागात पावसाचे प्रमाण कमी जास्त असते.        

मान्सून आणि चक्रीवादळ 
मान्सून काळात कमी दाबाची क्षेत्रे आणि तीव्र कमी दाबाची क्षेत्रे (डिप्रेशन) अगदी मान्सूनच्या सुरुवातीपासूनच म्हणजे जूनपासूनच निर्माण होऊ लागतात. मात्र त्यांची निर्मिती ही बंगालच्या उपसागराच्या मध्यापासून उत्तरेच्या भागात होत असल्यामुळे त्यांचे आयुष्य आठवडाभराचेच राहते. मात्र मान्सूनच्या उत्तरार्धात सूर्याचा विषुववृत्ताजवळून जसा प्रवास होऊ लागतो, तशी या कमी दाबाच्या क्षेत्रांची निर्मिती हिंदी महासागराच्या उत्तर भागात किंवा अंदमानच्या समुद्रात होऊ लागते. अशा कमी दाबाच्या क्षेत्रांना समुद्राकडून जमिनीकडे प्रवास करण्यासाठी तुलनेने अधिक कालावधी मिळाल्यामुळे त्यांची तीव्रता वाढून चक्रीवादळांची निर्मिती होते. म्हणूनच भारतात ऑक्टोबर, नोव्हेंबर हा चक्रीवादळांचा कालावधी मानला जातो. मान्सून काळात समुद्रपृष्ठावरून नैऋत्य मोसमी वारे वाहत असल्यामुळे समुद्रपृष्ठाचे तापमान सरासरी २६.५ अंश इतके असते. तसेच, या नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वर पाच ते बारा किलोमीटर पर्यंत पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांचा प्रवाह सक्रीय असतो. या दोन वाऱ्यांच्या प्रवाहाची रचना आणि समुद्र पृष्ठाचे सरासरी २६.५ अंश हे तापमान यांमुळे मान्सून सक्रीय असताना चक्रीवादळांची निर्मिती होऊ शकत नाही. यंदा मात्र तांत्रिकदृष्ट्या मान्सून सक्रीय असताना आणि समुद्रपृष्ठाचे तापमानही सरासरीजवळ असतानाही चक्रीवादळाची आणि त्यातही महाचक्रीवादळाची निर्मिती कशी काय झाली हा प्रश्न सध्या हवामानशास्त्रज्ञांना सतावत आहे. 

भारतात सर्वसाधारणपणे वर्षाला पाच चक्रीवादळे निर्माण होतात (जगभरात ८०). त्या पाचपैकी चार चक्रीवादळे ही बंगालच्या उपसागरात, तर एक अरबी समुद्रात निर्माण होते. बंगालच्या उपसागरात अनेकदा प्रशांत महासागराकडून अतिरिक्त बाष्प येत असल्यामुळे त्यांपासून या भागात चक्रीवादळे तुलनेने अधिक निर्माण होतात, तर अरबी समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे ही बंगालच्या उपसागाराकडून क्वचितच मिळणाऱ्या अतिरिक्त बाष्पाच्या आधारे तयार होतात. त्याच प्रमाणे अरबी समुद्राच्या पृष्ठाचे तापमान हे बंगालच्या उपसागरापेक्षा कमी असल्यामुळेही तिथे तुलनेने कमी वादळे निर्माण होतात. भारतात तीव्र चक्रीवादळांचा सर्वाधिक तडाखा आंध्र प्रदेशला, तर सर्वसाधारण चक्रीवादळांचा सर्वाधिक तडाखा ओडीशाला बसतो. 

भारतीय उपखंडात १९७० पासून १३ विनाशकारी चक्रीवादळे येऊन गेली ज्यांच्या वाऱ्यांचा वेग ताशी २०० किलोमीटरपेक्षा अधिक होता. १९७० मध्ये बांग्लादेशातील चित्तगोंग मध्ये धडकलेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यात तीन लाख लोक मृत्युमुखी पडले होते. २९ ऑक्टोबर १९९९ रोजी ओडीशातील पारादीपजवळ धडकलेल्या सुपर सायक्लोन मध्ये १५ हजार नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते.                                         
                                                            
'लैंडफॉंल' आणि प्रलय

पूर्णतः विकसित झालेल्या चक्रीवादळाचा घेरा ५०० ते दोन हजार किलोमीटरपर्यंत पसरलेला असतो. त्यावेळी केंद्राभोवती फिरणाऱ्या वाऱ्यांचा वेग ताशी दोनशे किलोमीटरचा टप्पाही ओलांडतो. असे चक्रीवादळ दिवसाला ५०० ते ६०० किलोमीटर वेगाने जमिनीकडे सरकत असते. ज्या क्षणाला ते जमिनीला येउन धडकते, त्याला शास्त्रीय भाषेत चक्रीवादळाचा लैंडफॉंल म्हणतात. चक्रीवादळाला समुद्राकडून मिळालेली ऊर्जा ही १०० हायड्रोजन बॉम्बपेक्षा अधिक असते. एवढी प्रचंड ऊर्जा धारण केलेले चक्रीवादळ जमिनीवर येताच तीन प्रकारे विनाश घडवते. चक्रीवादळातून वाहणारे प्रचंड वेगाचे वारे वाटेत येणाऱ्या सर्व अडथळ्यांना जमीनदोस्त करायला सुरुवात करतात. लहान घरे, झोपड्यांची वाताहत होते, झाडे उन्मळून पडतात, विजेचे, दूरध्वनीचे खांब पडतात, घराची छप्परे उडून जातात, अनेकदा पक्क्या इमारतींच्या भिंतीही कोसळतात. दुसरीकडे प्रचंड बाष्प धारण केलेले ढग मुसळधार कोसळत असतात. अशा ढगांकडून ५०० मिलीमीटर पेक्षाही जास्त (पुण्यातील हंगामातील सरासरीइतका) पाऊस एका दिवसात कोसळतो. यांमुळे अक्षरशः प्रलय येऊन वाटेत येणारे सर्व काही वाहून जाते. चक्रीवादळ तिसरा फटका समुद्राच्या लाटांमार्फत देते. कमी दाब आणि वेगवान वाऱ्यांमुळे 'लैंडफॉंल'दरम्यान समुद्र किनारपट्टीवर पाच मीटर उंचीच्या लाटा उसळू लागतात. यांमुळे सखल भागात किनाऱ्यापासून एक किलोमीटरपर्यंत पाणी आत येते. समुद्राच्या या पाण्याखाली शेती आल्यामुळे शेकडो हेक्टरची जमीन काही काळ नापीक होते. वादळाच्या या तीनही परिणामांचा थेट फटका बसल्यामुळे माणसांची आणि जनावरांची जीवित हानी मोठ्या प्रमाणात होते. हजारो लोक बेघर होतात, वीज, पाणी, संपर्क यांच्या यंत्रणा कोलमडल्यामुळे अडचणी आणखी वाढतात. वादळानंतर निर्माण होणारे आरोग्याचे, पुनर्वसनाचे प्रश्न सोडवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे असते. समुद्रावरून जमिनीवर येणारे एक वादळ लाखो लोकांवर थेट परिणाम करते आणि अब्जावधी रुपयांचे नुकसान घडवते.      
जमिनीवर आल्यावर मात्र चक्रीवादळाचा जोर झपाट्याने घसरतो. त्याला समुद्राकडून मिळणारे बाष्प आणि ऊर्जा एकाएकी बंद झाल्यामुळे त्याचे टप्प्याटप्प्याने (१२ ते २४ तासांत) डिप्रेशन आणि मग सर्वसाधारण कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर होते. त्यासोबत वाऱ्यांचा जोर आणि पावसाचे प्रमाणही कमी होते. 

आधुनिक तंत्रज्ञान आणि चक्रीवादळाचा अंदाज    
'पायलीन चक्रीवादळ १२ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा ते आठच्या दरम्यान ओडीशातील गोपालपूरजवळ जमिनीवर प्रवेश करेल.' भारतीय हवामानशास्त्र विभागाने तीन -चार दिवस आधीच वर्तवलेल्या या अंदाजामुळे आंध्रप्रदेश आणि ओडीशातील किनारपट्टीच्या भागातून नागरिकांचे तत्काळ स्थलांतर करण्यास आणि प्रतिबंधक उपाय योजण्यास प्रशासनाला वेळ मिळाला. देशभरातून संबंधित विभागांच्या सर्व यंत्रणा आपत्कालीन स्थितीशी मुकाबला करण्यासाठी त्या त्या भागांत रवाना झाल्या. आज हे घडू शकले याला कारण भारताकडे असणारे कृत्रिम उपग्रह, डॉप्लर रडार, वेदर स्टेशन यांचे जाळे आणि शास्त्रज्ञांनी त्या निरीक्षणांच्या आधारावर विकसित केलेली अंदाज वर्तवणारी मॉडेल. या मॉडेलच्या आधारे चक्रीवादळाच्या स्वरुपात होणारे बदल, त्याचा समुद्रावरील बदलत जाणारा मार्ग आणि जमिनीवर प्रवेश करताच त्यात होऊ शकणारे बदल आधीच अचूक वर्तवण्यात आले. यांमुळे या आधीच्या महाचक्रीवादळांच्या तुलनेत यंदा नुकसान कमी करणे भारताला शक्य होणार आहे.
-------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा